सातारा – सातारा शहरात कंटेनन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणची किराणा माल, भाजीपाला ही अत्यावश्यक दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद असल्याने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी इलक्ट्रिक, हार्डवेअर, मोबाईल आदी दुकाने सुरु करण्याची गरज आहे. शासनाने काही शहरांमध्ये ठराविक दिवस ठरवून इतरही दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. बाजारपेठ बंद ठेवणे हा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे लोकांची आणि व्यावसायिकांची गरज ओळखून गर्दी टाळण्यासाठी शहरातील इतर आवश्यक दुकाने ठराविक दिवस ठरवून सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे केली.
सातारा शहरात करोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने शहर आणि आजूबाजूची गावे 100 टक्के लॉकडाऊन केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार कंटेनमेंट झोन वगळून किराणा, भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे अर्थवयवस्था ठप्प झाली असून दुकानात काम करणारे कामगार, महिला यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांनाही इतर दैनंदिन वस्तूंची गरज भासत आहे.
त्यामुळे करोनापासून बचावासाठीचे निकष पाळून शहरात ठराविक दिवस नेमून इतर आवश्यक दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. म्हैसेकर यांच्याकडे केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कराड दौऱ्यावर आलेल्या डॉ. म्हैसेकर यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली.
दुकाने बंद असल्याने अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
लोकांनाही आता इलक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, कपडे, भांडी, क्रोकरी आणि मोबाईलशी निगडित वस्तूंची गरज भासू लागली आहे. सातारा शहरात केवळ दोन रस्त्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे ठराविक दिवस ठरवून देऊन लोकांसाठी आवश्यक असणारी दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. म्हैसेकर यांना सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन नागरिकांची गैरसोय दूर करू, असे डॉ. म्हैसेकर यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना सांगितले आहे.