नवी दिल्ली : पालघर झुंडबळी प्रकरणाचा तपास सुरू असून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला हे पोलिसांचे अपयश आहे, असे याचिकेत म्हटले आहे. न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठासमोर व्हिडीओ-कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि याचिकेची प्रत महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना देण्याचे आदेश दिले. राज्य सरकारला चार आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
पालघर झुंडबळीप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आणखी पाच जणांना अटक केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या झुंडबळीप्रकरणी आणखी पाच जणांना अटक केल्याने या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता ११५ झाली आहे.
पालघरमध्ये दोन साधूंसह तीन जणांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची १३ मेपर्यंत सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली.