नवी दिल्ली – लॉक डाऊनमुळे वृत्तपत्रांचे आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आणखी पाच-सहा महिने लॉक डाऊन चालू राहिले तर पंधरा हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ वृत्तपत्र उद्योगाला मदत करण्याची गरज असल्याचे इंडियन न्यूज पेपर सोसायटीने पुन्हा सांगितले आहे.
सोसायटीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, लॉक डाऊन चा सर्वात जास्त परिणाम वृत्तपत्र उद्योगावर झाला आहे. जाहिराती आणि विक्रीतून उत्पन्न जवळजवळ शून्यावर आले आहे.
जर या उद्योगाला आवश्यक मदत मिळाली नाही तर या लोकशाहीसाठी पूरक असलेल्या उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो असे सोसायटीचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयात कागदावरील पाच टक्के आयात शुल्क रद्द करावे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. वृत्तपत्राचा कागदावर त्यांच्या एकूण खर्चाच्या 40 ते 60 टक्के खर्च होतो.
या क्षेत्रावरील कर दोन वर्ष रद्द केला जावा. सरकारी जाहिरातीचा दर दुप्पट करण्यात यावा. सरकारकडून या क्षेत्रावर होत असलेल्या खर्चात शंभर टक्के वाढ करण्यात यावी अशा मागण्यांचा या पत्रात समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वृत्तपत्रांची थकीत बिले ताबडतोब मंजूर करावीत असेही या पत्रात म्हटले आहे.
या क्षेत्रात देशभर 40 लाख लोक काम करतात. त्यांच्या उपजीविकेच्या साधनांवर परिणाम झाला आहे. जाहिरात आणि विक्रीतून येणारा महसूल ठप्प झाल्यामुळे बऱ्याच वृत्तपत्रांना कर्मचाऱ्यांचे पगार करणे अवघड झाले आहे.