सुटे भाग उपलब्ध नाहीत; वितरण व्यवस्थाही नाही
नवी दिल्ली : एप्रील रोजी केंद्र सरकारने वाहन कंपन्यांना अंशत: काम सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी यासाठीची जमवाजमव करण्यात अडथळे येत असल्यामुळे देशातील बहुतांश वाहन कंपन्यांचे काम अजूनही ठप्प आहे.
वाहन कंपन्यांचे काम त्यांच्या स्वतःच्या कामाबरोबरच पुरवठादाराच्या कामावर अवलंबून असते. त्याचबरोबर सर्वांचे काम वितरकांशी संलग्न असते. ही सर्व साखळी व्यवस्थित सुरू झाल्याशिवाय आहे आम्हाला काम सुरू करता येणार नाही असे वाहन उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे.
लॉक डाऊनमुळे आमची पुरवठा साखळी खंडित झालेली आहे. अजुनही ती पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काम सुरू करता येणे शक्य नसल्याचे मारुती सुझुकी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात हरियाणा सरकारने मारुती सुझुकी कंपनीला काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सर्व काही सुरळीत चालू झाले तरच आम्हाला काम सुरू करता येईल असे मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले. ह्युंदाई इंडिया कंपनीने तामिळनाडूतील आपली काम सुरू केलेले नाही. फोर्ड इंडिया या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 3 मेपर्यंत तरी आम्ही काम सुरू करण्याच्या शक्यतेवर विचारही केलेला नाही. त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना टोयाटो किर्लोस्कर मोटर कंपनीचे प्रवक्त्याने सांगितले की, हा उद्योग सुरू करण्यासाठी या उद्योगाशी संबंधित इतर सर्व छोटे उद्योग सुरू होण्याची गरज असते. त्याचबरोबर वितरकांचे कामही नियमित सुरू होण्याची आवश्यकता असते. यातील काहीही सुरू झाले नसल्यामुळे आमची स्वतःची तयारी असली तरी आम्हाला काम सुरू करता आलेले नाही. टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने याबाबत बोलण्यास नकार दिला असला तरी या कंपनीच्या देशभरातील उत्पादन केंद्रांमधील काम आत्तापर्यंत सुरू झाले नसल्याचे समजते.
मर्सिडिज-बेंझ इंडिया या कंपनीने सांगितले की, राज्य आणि केंद्र पातळीवर लॉक डाऊन चालू असल्यामुळे आम्ही काम सुरू करण्याच्या शक्यतेवर अजून विचार केलेला नाही. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकांच्या हद्दीबाहेरील कारखान्यातील काम संसर्ग होणार नाही अशा पद्धतीने सुरू करण्यास हरकत नाही. मात्र एकूणच पुरवठासाखळी पूर्ववत झाल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही असे या कंपन्यांनी म्हटले आहे.