थिरूवनंतपूरम : करोना फैलावामुळे परदेशांत अडकून पडावे लागलेल्या भारतीयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून दीड लाखहून अधिक केरळींनी आपल्या राज्यात परतण्यासाठी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यावर आणि हवाई सेवा सुरू झाल्यावर परदेशांत अडकलेल्यांना परत आणण्याच्या दृष्टीने केरळ सरकारने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी रविवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला दोन दिवसांतच मोठा प्रतिसाद मिळाला. केरळमध्ये परतण्यासाठी पूर्वअट घालण्यात आली आहे. परदेशांत अडकलेल्यांना करोनाविषयक चाचणी करून घ्यावी लागणार आहे.
त्या चाचणीनंतर करोनाची लागण झालेली नसल्याचे प्रमाणपत्र असणारेच केरळमध्ये परतू शकणार आहेत. केरळमधील रहिवासी प्रामुख्याने आखाती देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. परदेशांतून आलेल्यांसाठी विमानतळांजवळच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या हालचालीही केरळकडून केल्या जात आहेत.