निमोणे – आपल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागातही करोनाचा संसर्ग वाढला आहे. शिरूर तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्वतः ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राजकीय हेवेदावे विसरून खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. परंतु शिंदोडी येथील एका सदस्याचा अपवाद वगळता बाकीचे ग्रामपंचायत सदस्य गावावर संकट असताना दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ फडके यांनी केला आहे.
शिंदोडी हे अंदाजे 2 हजार लोकसंख्येच गाव आहे. शिंदोडी ग्रामपंचायतीमध्ये 7 ग्रामपंचायत सदस्य आहेत. शिंदोडीत 3 वॉर्ड असून गेल्या 5 वर्षांत ग्रामपंचायत सदस्यांनी किती वेळा स्वतःच्या वॉर्डात फिरून सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर नियंत्रण राहिले नाही. भविष्यात जर यातून करोनासारखी महामारी गावात आली तर त्याला जबाबदार कोण? ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जातात. लाखो रुपये खर्च केले जातात. पण गावावर संकट आल्यावर मात्र, गाव रामभरोसे सोडले जात आहे, हिच मोठी शोकांतिका आहे.
शिंदोडी गावात फक्त एक दिवस लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. परंतु त्यानंतर गावात कोण येतयं कोण जातयं, याची माहिती ठेवणारी यंत्रणा नाही. गावात येणारा रस्ता आत्तापर्यंत 3 वेळा बाहेरच्या लोकांसाठी बंद करण्यात आला आहे. परंतु काही ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे परत तो सुरू करावा लागला आहे. त्यामुळे शिंदोडीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वेळीच ही परिस्थिती आटोक्यात आली नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम सर्व ग्रामस्थांना भोगावे लागणार आहेत.