नवी दिल्ली – मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार पाडून तेथे भाजपने सत्ता ताब्यात घेतल्याची घटना अलीकडेच घडली आहे, या सरकारला तेथे शपथ घेणे शक्य व्हावे म्हणूनच मोदी सरकारने देशातील लॉकडाऊनची अंमलबजावणी लांबवली, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.
येचुरी यांनी म्हटले आहे की, करोनाची देशात वेगाने होणारी लागण लक्षात घेऊन त्वरीत लॉकडाऊन जाहीर करणे अपेक्षित असताना 23 मार्च रोजी भोपाळमध्ये शिवराजसिंह यांचा शपथविधी होऊ देण्यात आला. आणि त्यानंतरच हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यातून मोदी सरकारची सत्तालोलूपता दिसून आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एका ट्विटर संदेशात त्यांनी हा आरोप केला आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये येचुरी यांनी म्हटले आहे की, भारतात करोनाची पहिली केस आढळून आल्याच्या घटनेला 89 दिवस झाल्यानंतर अजूनही देशात करोनाच्या पुरेशा चाचण्या होत नाहींत, त्यामुळे देशात केवळ लॉकडाऊन केला की करोना नियंत्रणात येईल अशा भ्रमात आपल्याला राहता येणार नाही. त्यासाठी स्क्रिनिंग आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवणेही अगत्याचे आहे. त्यांनी या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. वैद्यकीय उपाययोजनांबाबत त्या राज्यात पुरेशी पारदर्शकता बाळगली जात नाही असे ते म्हणाले.