सातारा (प्रतिनिधी) : संचारबंदी असतानाही मुंबईवरून गावी आले. मात्र याची वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा सहा लोकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एकाच कुटूंबातील पाच जणांचा समावेश आहे. गतं दोन-तीन दिवसांपूर्वी संकेत शंकर सुर्वे (वय 25 रा. अलवडी,ता. सातारा.हल्ली रा. दहिसर मुंबई) हा मुंबईहून गावी आला. मात्र त्याने याची माहिती कोणालाही दिली नाही. पोलिसांना याबाबत समजल्यानंतर पोलीस त्याच्या गावात गेले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने कोणालाही माहिती न देता तोंडाला मास्क न लावता काळजी घेतली नाही, हे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना सातारा तालुक्यातील बोरणे या गावामध्ये घडली आहे. मुंबईतील कोपरखैरणे येथून कदम कुटुंबातील पाच जण भाजी विक्री करणाऱ्या टेम्पोमध्ये बसून गावी आले शेंद्री फाट्यावर उतरल्यानंतर हे सर्वजण एका वाहनाने बोरणे गावात गेले. मात्र त्यांनी गावी आलो असल्याची माहिती कोणालाही दिली नाही. हा प्रकार सातारा तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक बर्गे यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते गावामध्ये गेले. संबंधित कदम कुटुंबीयांकडे त्यांनी गावी येताना शासकीय परवानगी घेतली होती का, अशी विचारणा केली. तसेच तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे का, याबाबतही विचारले असता त्यांनी कोणतीही खबरदारी न घेता गावी आले असल्याचे समोर आले. त्यामुळे या कुटुंबावर जिल्हाधिकार्यांच्या अदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात येण्यास प्रवाशांना मज्जाव करण्यात आला असतानाही अनेकजण मुंबई पुण्यावरून गावी येत आहेत. परंतु गावी आल्यानंतर त्यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देणे गरजेचे आहे. मात्र अनेकजण अशाप्रकारे माहिती लपवत असल्यामुळे आता पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्याहून अशाप्रकारे जर कोणी लपून-छपून आले असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.