हल्ली सगळ्यांना ज्याने हादरवून सोडलं आहे असा विषय, तो म्हणजे COVID19 उर्फ कोरोना. कोरोना हा एक विषाणूंचा समूह आहे. जो आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. काही प्रमाणात आपल्या पचनसंस्थेतही या व्हायरसमुळे बिघाड होऊ शकतो. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यावर साधारण १ ते १४ दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसायला सुरूवात होते. कोरोनाची लक्षणे खालीलप्रमाणे असतात :
१. खोकला
२. ताप
३. थकवा
४. श्वास घ्यायला त्रास
५. पोट बिघडणे
बऱ्याच प्रमाणात सामान्य फ्लू आणि कोरोनामुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे सारखीच आहेत, पण कोरोना व्हायरस नाकाचा आतला भाग, श्वसननलिका, छोटे वायुमार्ग, फुफ्फुसे यांच्यावर परिणाम करत असल्याने या आजारात श्वसनसंबंधी त्रास जाणवतो. तर आता पाहू, या कोरोना विषाणूचा सामना कसा करायचा? जेणेकरून आपण आणि आपले कुटुंब यापासून सुरक्षित राहू शकेल.
१.वारंवार किमान २० सेकंद हात साधा साबण किंवा हॅंडवाॅशने धुणे. बाहेरून आल्यावर, बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यावर तर हे अनिवार्यच. पाणी उपलब्ध नसल्यास सॅनिटायझरचा उपयोग करणे.
२.खोकताना तोंडावर रूमाल पकडणे, नसल्यास कोपर तोंडावर धरून खोकणे. जेणेकरून आपल्या खोकल्यावाटे बाहेर पडणाऱ्या शिंतोड्यातल्या विषाणूंमुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना संसर्ग होऊ नये.
३.चेहऱ्याला, नाकाला, तोंडाला वारंवार हाताने स्पर्श करू नये. अन्यथा बाहेर कुठे तरी हाताला चिकटलेला विषाणू या स्पर्शामुळे नाका तोंडावाटे सरळ श्वसनसंस्थेत जाऊ शकतो.
४.आपल्या पासून १मिटरच्या आत असलेला कोरोनाबाधित व्यक्ती जर शिंकला किंवा खोकला तर त्यातून उडणाऱ्या शिंतोड्यावाटे कोरोनाविषाणू आपल्या नाका तोंडावाटे श्वसननलिकेत जाऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी न जाता, शक्य तितके घरी थांबणे उत्तम.
५.आधीच आजारी असल्यास घरीच थांबावे. वरील लक्षणे दिसल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. या साथीशी लढण्याचा एक महत्वाचा उपाय “ सोशल डिस्टनिंग”, या अंतर्गत सरकारने शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. अनेक पालकांना हा प्रश्न पडतो की या घरी असणाऱ्या मुलांच मन रमवायच कस? कारण बाहेर खेळायला पाठवणही तितकस सुरक्षित नाहीय. मला वाटत हीच वेळ आहे जेव्हा आपण मुलांना वाचनाची गोडी लावू शकतो. त्यांना घरी चांगले चांगले चित्रपट दाखवू शकतो. मुलांचे जे छंद आहेत ते जोपासण्यात त्यांना मदत करू शकतो. आजकाल बरेच वेगवेगळे आॅनलाईन कोर्सेसही असतात इंटरनेटवर, मुलं ते शिकू शकतात. मग सापशिडी, लुडो, कॅरम, पत्ते, बुध्दिबळ असे अनेक इन डोअर गेम्स तर असतातच.
कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारच्या व्यवस्थापनामध्ये असलेच पाहिजेत असे मुद्दे:
१.आंतरराष्ट्रीय सीमा बंद करणे.
२.परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच आरोग्य तपासणी करणे.
३.कोरोनाची साथ जगभरातून जाईस्तोपर्यंत प्रवाशांच्या भारतात येण्यावर आणि भारतातून बाहेर जाण्यावर निर्बंध लावणे.
४.देशात जमावबंदी करणे.
५.साथीबद्दल जनजागृती करणे.
६.मास्कस, सॅनिटायझरच्या अवाजवी किंमतींवर निर्बंध करणे.
७.या साथीमुळे बरेच उद्योगधंदे बंद आहेत, तर ज्यांचे हातावर पोट आहे असे, अपंग, वृध्द अशांना काही मदत लागल्यास पुरवणे.
८.जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याची पूर्तता करणे.
अशा प्रकारच्या साथीच्या आजारांना रोखण्यात सरकारची भूमिका फार महत्वाची असते. नागरिकांनीही अफवांना बळी न पडता, WHO सारख्या साईटसवरून योग्य ती माहिती मिळवत राहावी. अशा प्रसंगी समाजात शांतता टिकवणे महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळे एकजूट होऊन स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेऊन या संकटातून नक्कीच बाहेर पडू.
– सई मनोज देशमाने