नगर – (प्रतिनिधी) -कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश शामराव गिऱ्हे यांची हत्या करणारे चौघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. अटक करण्यात आलेले दोघे आरोपी हे सऱ्हाईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपी नितीन सुधाकर अवचिते (रा.तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, ता-मावळ, जि-पुणे), शरद मुरलीधर साळवे (रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे), रामदास माधव वलटे (रा.लौकी पोस्ट दहेगाव बोलका ता.कोपरगाव), आकाश मोहन गिरी (रा. खराबवाडी, खेड,जि,पुणे) याना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरेश शामराव गिरे व रवि आप्पसाहेब शेटे व त्याचे टोळीतील साथीदारांसोबत सुरेश गिरे हे रवि शेटे यांचे पुर्व वैमनस्य होते. या वैमनस्यातुनच वारंवार भांडणे होवुन त्यांचे एकमेकांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यातुनच 2012 मध्ये रवि शेटे व त्याचे साथीदारांनी सुरेश गिरे यांचा मित्र बंटी ऊर्फ विरेश पुंजाहरी शिनगर यांचा खुन केला होता. या गुन्ह्यामध्ये रवि शेटे व त्याचे इतर साथीदारांना जन्म ठेपेची शिक्षा झालेली आहे.
15मार्च रोजी सायंकाळी पावने सात वाजता सुरेश गिऱ्हे हे त्यांचे राहते घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुटूंबासह बसलेले असताना एक पांढरे रंगाची कार मधून अनओळखी चौघे व एक काळे रंगाची दुचाकीवरून रवि आप्पासाहेब शेटे, विजू खर्डे यांनी सुरेश गिरे यांना गोळ्या घालून ठार मारले. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवि शेटे याने सुमारे 15 दिवसांपासुन गुन्ह्याचा नियोजनबद्ध कट करुन तळेगाव (जि.पुणे) येथुन भाडोत्री मारेकरी आणुन गुन्हा केलेला असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शिशीरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्या पथकाने आरोपी रवि शेटे व बिजू खर्डे याचे सोबत असलेले अनोळखी मारेकरी नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश गिरी यांना सापळा रचवून पुणे येथून ताब्यात घेतले.