नवी दिल्ली – शाहीन बागेतील निदर्शकांमुळे सामान्य जनतेला त्रास होत असून या निदर्शकांना तेथून त्वरीत हटवले जावे अशी मागणी भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी आज लोकसभेत केली. त्यांनी शुन्य प्रहरात हा विषय तेथे उपस्थित करताना सांगितले की, नॉयडा भागातून रोज सुमारे पाच लाख लोक दिल्लीत येत असतात त्या सर्वांनाच या आंदोलनाचा त्रास होत आहे. निदर्शनाच्या ठिकाणापासून रूग्णवाहिका जाण्यासही जागा दिली जात नाही असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या 15 डिसेंबर पासून शाहींनबागेत सीएए, एनआरसीच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. दिल्ली सरकारने शहरात 50 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी शाहीनबागेतील निदर्शकांनी मात्र तेथून हटण्यास नकार दिला आहे. आम्ही 50-50 निर्दकांची स्वंतत्र गट करून येथे वेगवेगळ्या अंतरावर बसू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर रमेश बिधुरी यांनी हा विषय उपस्थित केला होता.