ती जन्मतः धाडसी होती… संघर्ष हा जणू तिच्या पाचवीलाच पूजलेला… लहानपणी पायात घालायला चप्पलही नसायची… त्यामुळे अनवाणी फिरण्याची सवय पुढच्या आयुष्यातील काटेरी वाटांना सोपे करीत गेलेली… तिने पदवीपर्यंतचे शिक्षणही असंख्य अडचणींना तोंड देत मोठ्या हिंमतीने पूर्ण केले… अन्याय सहन करायचा नाही, तर त्याला प्रतिकार करायचा, या जन्मदात्याच्या शिकवणीने दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या घरमालकाला चोप देण्याचे बळ निर्माण केले… आणि याच धाडसामुळे तिच्या आयुष्यात आलेला “टर्निंग पॉईंट’… एखाद्या चित्रपटात शोभेल, असा आयुष्याचा चित्तथरारक अनुभव गाठीशी घेऊन राजकारणात महत्त्वाची पदे भूषवित स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या सीमा सावळे या पिपरी-चिंचवड शहरातील एक “दबंग राजकारणी’ महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांची संघर्षकथाही तितकीच रोमहर्षक आणि प्रेरक आहे…
राजकारण म्हटले की डोळ्यासमोर घराणेशाही येते. आई-वडिलांच्या जीवावर आयुष्यात तसेच राजकारणात यशस्वी झालेले अनेकजण अवती-भवती आहेत. मात्र कठीण प्रसंगावर मात करत स्वतःच्या हिंमतीवर राजकारणात नगरसेविका सीमा सावळे यशस्वी झाल्या. लहानपणी घरामध्ये अठराविश्व दारिद्य्र असतानाही त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मोठ्या स्वाभिमानाने पूर्ण केले. पुढे स्वतःच्या हिमतीवर राजकारणामध्ये भक्कम पाय रोवत त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात एक नवीन ओळख निर्माण केली. घराण्यात राजकारणाचा मागमूसही नसताना जेव्हा अशी माणसे यशस्वी होतात तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
सीमाताई या अमरावतीतील अमानवाडीच्या. त्यांचे वडील रेल्वेत कामाला होते. वडिलांकडूनच त्यांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचे बाळकडू मिळाले. त्यांच्या लहानपणी त्यांनी अनेक खस्ता खात आपले शिक्षण पूर्ण केले. चौथीपर्यंत पारावरची शाळा, पाचवीनंतर बहिणीसोबत वसतिगृहात राहत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. जीवनामध्ये कितीही संकटे आली, तर कोणापुढे लाचारी पत्करायची नाही ही वडिलांची शिकवण त्यांना स्वाभिमानाने शिकण्यास प्रेरणा देत होती. पुढे सातवीला गेल्यानंतर वडिलांची बदली झाली. त्यांचा पगार वाढला मात्र खाणारी तोंडेही खूप होती. वडील एकटे कमावणारे असल्याने मोठे कुटुंब चालवताना त्यांची मोठ्या प्रमाणावर ओढाताण होत असे. तत्कालीन परिस्थितीत मुलींचे शिक्षण दहावीपर्यंतचं कसेबसे पूर्ण व्हायचे. सीमाताईंनी चक्क महाविद्यालयात प्रवेश घेतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्या विरोधात अनेक कुरबुरी केल्या. त्यांना नावे ठेवली. मात्र वडिलांचा भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे त्यांनी पदवीपर्यंचे शिक्षण पूर्ण केले. कठीण परिस्थितीतही शिक्षणाचे महत्त्व समजलेल्या सीमाताईंनी माघार न घेता महाविद्यालयीन शिक्षण सुरूच ठेवले आणि त्या त्यांच्या घराण्यातील पदवी घेणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सीमाताईंनी नोकरीसाठी आयटीआय फूड प्रिझर्व्हेशन आणि बीए दोन्ही करायला घेतले. 1992 साली त्यांचे लग्न झाले आणि त्या पुण्यामध्ये आल्या. सासरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. बाळंतपणानंतर सव्वा महिन्यातच त्यांनी नोकरी सुरू केली. एमआयडीसीत त्यांनी कंपन्यांमध्ये काम केले. अगदी हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणूनही त्यांनी नोकरी केली. सहा-सहा महिन्यांपुरती नोकरी मिळायची. त्यानंतर पुन्हा दुसरी नोकरी शोधायची, असा त्यांचा प्रवास सुरू होता. लहानपणापासूनच पैशांची किंमत कळली असल्यामुळे नोकरी करत असताना पैशाची बचत व्हावी, यासाठी त्या काळेवाडी ते पिंपरी असा प्रवास पायी चालत करायच्या. कामावर गेल्यावर बाळ घरी एकटेच असायचे. त्याच्यासाठी सीमाताईंचा जीव तुटायचा. मात्र कामावर नाही गेले तर खाणार काय, घरखर्च कसा काढणार, हा प्रश्न असल्याने जावेच लागायचे.
सीमाताई ज्या भाडेतत्त्वार घेतलेल्या घरात राहायच्या त्या भागात घरमालक – भाडेकरू असा खूप वाद असायचा. एकदा त्या राहत असलेल्या घराचे घरमालक रात्री दहा वाजता दारू पिऊन त्यांच्या घरी आले. “माझे घर आत्ताच्या आता खाली कर’ असे म्हणून गोंधळ घालायला लागले. तेव्हा सीमाताईंना खूप संताप आला. अन्याय सहन करायचा नाही, ही शिकवण लक्षात ठेवून त्यांनी चक्क त्यांच्या घरमालकाला चोप देत चांगला धडा शिकविला. हाच प्रसंग त्यांच्यासाठी मोठा “टर्निंग पॉईंट’ ठरला. तेव्हा घरासमोर झालेल्या या गोंधळामुळे भरपूर गर्दी जमा झाली होती. त्या गर्दीत शिवसेना पक्षाचे काही कार्यकर्तेही होते. त्यांनी सीमाताईंचा रणरागिणीचा अवतार पहिला आणि त्यांच्यातील “स्पार्क’ त्यांना जाणवला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी सीमाताईंना पाठिंबा दिला. त्यानंतर पुढे सीमाताई शिवसेनेचे काम करायला लागल्या. आणि तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची घोडदौड सुरू झाली. सडेतोड बोलणे आणि ताबडतोब “ऍक्शन’ घेण्याच्या त्यांच्या शैलीमुळे सीमाताई लवकरच राजकारणात नाव मिळवू लागल्या.
1995 च्या निवडणुकीमध्ये गजानन बाबर यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा युतीचे सरकार आले. 2002 मध्ये सीमा यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये मोठे वादळ आले. त्यांच्या सडेतोड बोलण्याच्या स्वभावामुळे राजकारणातही त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले. मात्र त्या खचल्या नाहीत. फायनान्स एजन्सी सुरू करत त्यांनी आपला व्यवसाय पुण्याबाहेरही सुरू केला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा ठिकाणी व्यवसायाचा जम बसविला. व्यवसायामध्येही त्यांची यशस्वी वाटचाल सुरू होती, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगेळेच होते. इकडे वडिलांची तब्येत खूप खालावली. 2005 साली ते वारले आणि सीमा यांच्या पाठीवरील हातच नाहीसा झाला. त्यांचा मोठा आधारवड कोसळला. मात्र ते दुःख पचवत त्यांनी कोकणामध्ये नारायण राणेंनी पक्ष सोडल्यानंतर लागलेली पोटनिवडणूक जिंकवण्यासाठी मेहनत घेतली. त्या रात्रंदिवस काम करू लागल्या. भरपूर मेहनत घेतल्यामुळे त्यांनी ती पोटनिवडणूक जिंकली.
सन 2006 मध्ये पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत होते. यादरम्यान सीमाताईंनी शहरात सामाजिक कार्य जोमाने सुरू ठेवले. मोर्चा, आंदोलने अशा ठिकाणी सीमाताईंचा बुलंद आवाज घुमायचाच. समाजकार्यात स्वतः अग्रेसर असलेल्या सीमा यांनी नागरिकांसाठी तळमळतेने कार्याला सुरुवात केली. प्रभागामध्ये नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे व अन्य उपक्रमांचे ते आयोजन करू लागल्या. तेथून पुढे त्या शहराच्या राजकारणात सक्रीय झाल्या. 2007 च्या निवडणुकीमध्ये त्या जिंकल्या. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्या विजयाचा वारू रोखण्यात कुणाला यश आले नाही. सीमाताई म्हणतात, “तुम्हाला व्यवस्था बदलायची असेल, तर तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये येणे आवश्यक आहे. अनेकांना बाहेरून वाटते की राजकारणी सगळेच भ्रष्ट असतात. मात्र एक पैशाचाही भ्रष्टाचार न करताही चांगल्या भावनेने जनतेची कामे करता येतात. आज ती समाजाची खरी गरज आहे. आज सुशिक्षित नागरिकांनी राजकारणाकडे वळले पाहिजे. विशेष करून महिलांनीही राजकारणामध्ये सक्रीय भाग घेतला पाहिजे. कोणालाही न घाबरता बोलायला शिकले पाहिजे. आपली बाजू मांडायला शिकले पाहिजे.
दरम्यान, शिवसेनेतून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्या दरम्यान शहर विकासासाठी अनेक महत्त्वाचे आणि उपयुक्त निर्णय त्यांनी घेतले. सीमाताई आज राजकारणामध्ये यशस्वी आहेत. यासोबतच त्या सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर आहे. “जिजाई’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. विशेषतः महिलांसाठी संस्थेच्या माध्यमातून सीमाताई अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी त्यांनी आतापर्यंत भरपूर कामे केलेली आहेत. विरोधकांच्या “अरे’ला “कारे’ करणारी “डॅशिंग’, दबंग राजकारणी महिला म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.