चेन्नई – सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणत्याही निष्कर्षावर पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते काल आयआयटी मद्रास इथे बहिःशाल व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. तीन शेजारी देशांमधल्या धार्मिक छळ सोसाव्या लागलेल्या अल्पसंख्य समुदायातील लोकांना नागरिकत्व देण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा आणल्याचे याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी सांगितले.
लोकशाहीमध्ये सर्वांनाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र तो कायदेशीर चौकटीला धरुनच असावा, असे त्यांनी सांगितले. महिलांना काही प्रमाणात राखीव जागा ठेवणे उपयुक्त ठरेल, मात्र राजकीय पक्षांनी कोणत्याही राखीव जागांच्या व्यतिरिक्त देखील महिलांना निवडणुका लढण्याची संधी दिली पाहीजे, असे संसद आणि राज्य विधानसभांमधल्या प्रतिनिधित्वाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना नायडू म्हणाले.