नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीमध्ये उफाळलेल्या दंगलीत मंगळवारपासून चार मुले बेपत्ता आहेत, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. इमाम जलालुद्दिन यांची हत्या केल्यानंतर जमावाने ब्रीज पुरी भागातील फारूकी मशिद आणि मदरसा पेटवून दिला. या मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाचे वडील रियाझ अहमद म्हणाले, मंगळवार रात्रीपासून या मदरशातून किमान चार मुले बेपत्ता आहेत.
मंगळवारी दंगल उसळल्यानंतर मुलांनी मदरशात आश्रय घेतला. मात्र, रात्री दंगलखोरांनी मदरशावरच हल्ला चढवला. त्यानंतर चार मुले बेपत्ता आहेत, असे सांगून त्यांनी मुलांची विखुरलेली पुस्तके कपडे आणि अन्य वस्तू दाखवल्या. ते म्हणाले, या मदरशात 200 विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण 10-15 गरीब मुले तेथेच रहात असत. ज्येष्ठ इमामांना रुग्णालयातून सोडल्यानंतरच नेमकी किती मुले बेपत्ता झाली आहेत, ते नेमकेपणाने समजू शकेल.
ही मुले हरवल्याबद्दल पोलिसांत फिर्याद दिली आहे का? असे विचारता ते म्हणाले, लोक अजून धक्क्यातून सावरले नाहीत. अजूनही ते घाबरलेलेच आहेत. या मशिदीची आणि मदरशाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मंगळवारी जमावाने आधी मशिद पेटवली. इमामांना मारहाण केली आणि त्यानंतर मशिदीमागे असणाऱ्या मदरशावर हल्ला चढवला. तुम्ही केलेली नासधूस पहा. या भगात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांचे संरक्षण मुस्लिमांनी केले. आम्हाला अजून समजत नाही मग त्यांनी मशिद आणि मदरशावर का हल्ला केला. आम्हालाच दंगलखोर समजतील अशी भीती वाटत असल्याने लोक पोलिसांना भेटण्यास घाबरत आहेत, असेही स्थानिकांनी सांगितले.