रेडा-रासायनिक खतांच्या अतिवापरामुळेच जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करूनच योग्य खतांचा वापर करावा, असे आवाहन इंदापूर तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पंधारवाडी (ता. इंदापूर) येथे शेतकरी मेळावा व मृद आरोग्य पत्रिका दिवस नुकताच साजरा करण्यात आला, यावेळी जाधव बोलत होते.
बावडा मंडल कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, विशेषज्ञ हनुमंत शेंडगे, नीलेश वास्टर, सरपंच दिगंबर निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक अन्वर कलाल, कृषी सहायक अतुल जावळे, ग्रामसेवक फिरोज पठाण, व्यंकट भोसले तसेच बावडा मंडल मधील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी मका पिकावरील लष्करी अळी, हरभरा पिकावरील घाटे अळी यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच दिगंबर निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.