12 वर्षांनी खटला निकाली ः सर्व जण भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते
राजगुरुनगर-शिंदे (ता. खेड) येथे होऊ घातलेल्या व मानवी जीवनास हानिकारक तसेच सजीव सृष्टीस घातक असलेल्या डाऊ केमिकल कंपनी विरोधात आंदोलकांनी आंदोलने करून ही कंपनी महाराष्ट्रातून हद्दपार केली; मात्र त्यावेळी आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर यांच्यासह 38 जणांना आंदोलन केल्याबद्दल गुन्हे दाखल झाले होते.
हा खटला 12 वर्षांपासून खेड न्यायालयात सुरू होता. खेड न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. देवरे यांनी शुक्रवारी (दि. 14) या खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निकाल दिला. हे सर्व जण भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. खटला सुरु असताना तिघा जणांचे निधन झाले आहे.
सन 2008 मध्ये चाकण परिसरातील शिंदे गावच्या हद्दीत डाऊ केमिकल या आंतरराष्ट्रीय रासायनिक संशोधन व निर्मिती असे कार्य असलेल्या कंपनीचे काम सुरु झाले.
एका वर्षात कंपनीच्या अपकीर्तीची माहिती बाहेर येऊ लागली. तसा कंपनीला विरोध होत गेला. शिंदे गावच्या नागरिकांनी सुरुवातीला आंदोलन केले. शासनाने पोलीस बळ वापरून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवसेना, वारकरी सांप्रदायिक अनुयायिनी साथ दिली. पुढील काही महिन्यात आंदोलनाला हिंसक वळण लागत गेले. काही एकरात काम सुरु असलेली अखंड कंपनी पेटवून देण्यात आली. अखेर नागरिकांच्या आंदोलनापुढे कंपनी आणि राज्याच्या सरकार व प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
कंपनी उभारण्याचे काम स्थगित करावे लागले. गेली बारा वर्षे राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरु होता. आज निकाल असल्याने राजगुरुनगर न्यायालयात शिंदे गाव आणि खटला सुरु असलेल्या अशा नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. निकाल लागल्यावर आणि निर्दोष मुक्तता झाल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद होता. आंदोलकांच्या बाजूने ऍड. गणेश होनराव यांनी वेळोवेळी युक्तीवाद केला.
- डाऊ कंपनी उभारणी सुरू झाल्यावर शेकडो एकर जागेला शेड करून आणि सुरक्षा ठेवून बंदिस्त कामकाज सुरु होते. शिंदे गावात होऊ घातलेल्या व मानवी जीवनास हानिकारक तसेच सजीव सृष्टीस घातक असलेल्या डाऊ केमिकल कंपनी विरोधात आंदोलकांनी आंदोलने करून ही कंपनी महाराष्ट्रातून हद्दपार केली. नागरिकांचे आंदोलनाचे वृत्तांकन व डाऊ कंपनीचा इतिहास व त्यापासून होणारे दुष्परिणाम याबाबत “दैनिक प्रभात’ने सडेतोड लिखाण केले होते. पुढे आंदोलनाला सुध्दा मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी दिली. हे आंदोलन राज्य आणि देशपातळीवर प्रसिद्ध होण्यात “प्रभात’चा मोठा वाटा राहिला.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार - 2008 साली डाऊ कंपनी हद्दपार करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकावरील जे गुन्हे दाखल झाले होते, ते मागे घेण्यासाठी आंदोलन झाले होते. या आंदोलनात दोन माजी खासदारांसह 38 जणांवर गुन्हा दाखल केला होता. हा खटला खेड न्यायालयात बारा वर्षांपासून सुरु होता. त्याचा निकाल येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे. त्यांच्यावर कोणताही पुरावा सिद्ध न झाल्याने आरोपीना दोषमुक्त केले आहे.
-ऍड. गणेश होनराव, आंदोलकांचे वकील - यांची झाली मुक्तता
शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, विजया शिंदे, राम गावडे, अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, शिवाजी वर्पे, हरिदास गोकुळे, राजन परदेशी, महेंद्र घोलप, विलास ढेरंगे, सुनील तांबे पाटील, पांडुरंग गोरे, प्रदीप कुलकर्णी, गणेश पऱ्हाड, यशोदा जगताप, आशा गायकवाड, उज्वला वाळके, दत्ता सांडभोर, बाळासाहेब येवले, शंकर खेंगले, रोहिदास तापकीर, रामहरी आवटे, प्रदीप मुनोत, शेखर पिंगळे आदी भाजपा, शिवसेनेच्या 38 जणांची डाऊ केमिकल आंदोलन खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.