थिरूवनंतपुरम- आपल्याला कोणतीही पुर्व कल्पना न देता केरळ सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्याला सुप्रिम कोर्टात परस्पर आव्हान देणारी याचिका दाखल केल्यामुळे केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आज केरळचे मुख्य सचिव टॉम जोसे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना या विषयी कल्पना दिली. राज्यपाल आणि मुख्य सचिवांची ही भेट 20 मिनीटे चालली.
या भेटीत काय झाले याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांचा मोठा चमु राजभवनाच्या बाहेर थांबला होता. पण त्यांच्याशी न बोलताच मुख्य सचिव रवाना झाले. राज्यपालांनी या प्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. तो त्यांनी सादर केला किंवा कसे याविषयीही माहिती समजू शकलेली नाही. पण राज्यपालांना टाळून राज्य सरकारने हेतुपुर्वक हा प्रकार केलेला नाही असे मुख्य सचिवांकडून त्यांना सांगण्यात आले असे समजते. राज्यपालांविषयी प्रशासनाच्या मनात कोणताही आकस नाही हेही मुख्य सचिवांनी त्यांच्या लक्षात आणून दिले असेही सांगण्यात येत आहे.