आमदार अशोक पवार ः शिरूरमध्ये जनता दरबारात अधिकाऱ्यांना सल्ला
शिरूर – राज्य शासनाच्या सेवाहमी कायद्यानुसार शासकीय कार्यालयात सर्व नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना हेलपाटे होतील, असे काम करू नये व कामात दिरंगाई करू नये. आपण नागरिकांना न्याय देण्यासाठी बसलो आहोत याचे भान ठेवावे, असा सज्जड इशारा आमदार अशोक पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
शिरूर तहसीलदार कार्यालय सभागृहात आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कार्यालयातील कामांची होणारी अडचण सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवला होता. या जनता दरबारात शिरूर तालुक्यातील एकूण 30 खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुजाता पवार, बाजार समिती सभापती शशिकांत दासगुडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, तहसीलदार लैला शेख, गट विकास अधिकारी विजय नलावडे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सदाशिव शेलार, सुरेंद्र कुमार राऊत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, वीज वितरण कंपनीचे हितेंद्र भिरुड, नितिन महाजन, भगवान विधाटे, भूमी अभिलेख अधीक्षक व्ही. व्ही. ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे एम. आर. सोनवणे, जिल्हा परिषद उपअभियंता महेंद्र कोठारे, यांसह सर्व तालुक्यातील शासकीय अधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील जनता दरबारात उपस्थित ज्या नागरिकांची जमीन नोंदणी होत नाही अशा नागरिकांची नोंदणी त्वरित करण्यात यावी यासाठी आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेतला.
तहसीलदार शेख यांनी त्यास लवकरात लवकर नोंदणी करून देण्याचे यावेळी सांगितले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना लवकरात लवकर शेतीपंपासाठी कनेक्शन द्यावे यासाठी सूचना दिल्या. पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाची तक्रार समजून घ्यावी. संजय गांधी, अपंग, एसटी महामंडळ या कार्यालयाच्या ही कामाचा आढावा यावेळी घेण्यात येऊन लवकरात लवकर या नागरिकांचे व शिरूर शहरात एसटी याव्यात यासाठी प्रयत्न करावे आणि एसटी बसेस शहरातून येत नाही. त्यांच्यावर कारवाई करावी, असे शिरूर आगाराचे प्रमुख यांना सांगितले.
प्रत्येक खात्याच्या नागरिकांनी आलेल्या तक्रारदार किंवा आपलेच काम घेऊन आलेले शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना तुमचे काम किती दिवसांत होणार आहे, याची वेळ आणि तारीख सांगितली तर नागरिक शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांचे हेलपाटे वाचतील.विनाकारण नागरिकांना त्रास देण्याचे व हेतूपुरस्सर कुठले काम अडवल्याचे दिसून आल्यास यावाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
– अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली