पुणे – “केंद्र सरकारने आणलेला नागरिकता सुधारणा आणि नागरिकत्व नोंदणी कायदा हा काळा कायदा आहे. यामुळे देशाचे विभाजन होईल. हा कायदा सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा 30 जानेवारीपासून राजघाट येथे आंदोलन करू, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल या संघटनांतर्फे नागरिकत्व नोंदणी आणि सुधारणा कायद्याच्या विरोधार्थ गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. याचे पुण्यात आगमन झाले असून, त्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत यशवंत सिन्हा, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी हे मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सिन्हा म्हणाले, “नागरिकत्व नोंदणी, सुधारणा कायदा हा काळा कायदा असून तो मागे घ्यावा, या मागणीसाठी आम्ही ही गांधी शांती यात्रा सुरू केली आहे. मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा महाराष्ट्रातून पुढे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश असा प्रवास करत दिल्ली येथे पोहोचेन. 30 जानेवारी रोजी दिल्लीतील राजघाट येथे गांधीजींना अभिवादन करून या यात्रेची समाप्ती होणार आहे.’
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “देशाची युवाशक्ती आज अशांत आहे. पुन्हा जयप्रकाश नारायण यांची चळवळ सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांच्या अहंकारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी विश्वासार्हता गमावली आहे. ते बोलतात एक, करतात भलतेच.’