राजगुरुनगर -भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी 2020 रोजी शौर्यदिनानिमित्ताने विजयी स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशासह महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात या निमित्ताने शांतता राखून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या भाविकांना महाराष्ट्र शासनाकडून सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आपण शूरविरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे या मागणीचे निवेदन रिपाइं (आठवले) चे पुणे जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालय मुंबई येथे समक्ष भेटून दिले.
यावेळी येणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, त्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रशासनाला शांततेचे सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी बैठकीत राज्याचे गृह सचिव, पोलीस महासंचालकासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.