बावडा -संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे. परंतु ते आजही कागदोपत्रीच शंभर टक्के झाले आहे. अस्तित्वात मात्र एकही गाव अजूनही स्वच्छ नाहीच. याला गावोगावचे राजकारणी व प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे जनतेचे स्वास्थ्य मात्र दिवसेंदिवस बिघडत आहे. यावर कोणीही बोलायला तयार नाही.
त्यामुळे स्वच्छता अभियान आणि निर्मलग्रामचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसत आहे. ही विदारकता दूर करण्यासाठी सर्व स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
दि. 2 ऑक्टोंबर 2014 रोजी केंद्र सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात केली.
ती म्हणजे स्वच्छ भारत अभियान. शहरांबरोबरच प्रत्येक गाव स्वच्छ व्हावे आणि नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे, हा यामागचा हेतू होता. परंतु राजकारणी मंडळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोयीस्काररित्या कागदोपत्री 100 टक्के काम पूर्ण झाल्याच्या नोंदी लावल्या आहेत. मात्र, अस्तित्वात 70 टक्के देखील काम पूर्ण होऊ शकले नाही, हेच वास्तव अधोरेखित होत आहे.
घरोघरी शौचालये बांधण्यासाठी ग्रामीण भागात 12 हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. काहींनी शौचालये बांधली तर काहींनी न बांधताच अनुदान प्रशासन व राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून लाटले. सध्या इंदापूर तालुक्यातील एकही गाव असे नाही की, ज्या गावातील लोक प्रांतःविधीला रस्त्यकडेला बसत नाहीत. गावोगावी गावाबाहेरच्या रस्त्याकडेला घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे वास्तव दिसत आहे. रात्रीच्या व पहाटेच्या अंधारात लोक प्रांतःर्विधी रस्त्यकडेलाच उरकतात. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.
याचा परिणाम मात्र नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे संसर्गजन्य रोगांचे संक्रमण प्रत्येक घरात होत आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या निश्चितच चिंताजनक बाब आहे. पण याचा बारकाईने कोण आणि कधी विचार करणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार काय, जनतेच्या आरोग्यासोबत राजकारणी मंडळी व प्रशासन किती दिवस खेळणार? असा खडा सवाल नागरिकांमधून उमटत आहे.