पुणे –“आघाडी सरकार नियमबाह्य काम करत असून, अजित पवार यांनी कोणत्या अधिकारात बैठक घेतली माहिती नाही. छगन भुजबळ यांनी त्यांना अधिकार दिले, असे बोलले जाते. मात्र, शासनामध्ये असे अधिकार देता येत नसून, सगळे नियम धाब्यावर बसवून कारभार चालल्याचा आरोप भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या “दादा’ शैलीत उत्तर देत “एखाद्या खात्याचा मंत्री तशा सूचना देऊ शकतो. पाहिजे तर ज्यांनी मला अधिकार दिले त्यांनाच आपण विचारू,’ असे म्हणत राष्ट्रवादीच्या “दादा’ने, भाजपच्या “दादा’ला टोला लगावला.
मंत्रिमंडळात किमान 12 मंत्री पाहिजेत. तसे नसेल, तर त्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द होतात, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर केले. तर त्यांचाच पक्षातील खासदार गिरीश बापट यांना अजित पवार यांना दिलेल्या अधिकाराबाबत विचारले असता, “पुणेकरांच्या हिताची बैठक असल्यामुळे असल्या राजकारणात मला जायचे नाही. उगाच “टेक्निकल मुद्दे’ काढून राजकारण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे वक्तव्य पाटलांना सल्ला होता का? असा प्रश्न उपस्थित होतो.
कालवा समिती बैठकीबाबत पाटील म्हणाले, “पुण्याला पाहिजे तेवढे पाणी देत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जाते. तसे असेल तर गुरुवारी पाणीपुरवठा बंद का असतो. त्यावर पुणे महानगरपालिका उत्तर देऊ शकली नाही. तर दुरुस्तीसाठी बंद करतो असे अधिकारी सांगतात. मुळात लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची गरज वाढत चालली असून, वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण आवश्यक आहे.’
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाक्षेत्रात पुरेसा साठा आहे. त्यामुळे भविष्यात शहरावर पाणी कपातीची वेळ येईल, असे वाटत नाही. जॅकवेलच्या माध्यमातून शेतीला पाणी देणे, दुरुस्ती करणे, काटकसरीने पाणी वापरले आणि कॅनॉलमधून जाणाऱ्याच पाण्याचा उपसा केला नाही तर शहर आणि जिल्ह्याला पाणी कमी पडणार नाही. पाण्यामध्ये राजकारण न आणता सर्वांना पाणी मिळाले पाहिजे.
– खासदार गिरीष बापट