“का’ वरून अमित शहा यांनी केली टीका
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक गैरसमज पसरवत आहेत आणि राजधानीतील वातावरण दूषित करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
डाव्या विचारांचा पगडा असलेल्या विचारवंतांकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असल्याच्या संदर्भाने ते बोलत होते. “तुकडे तुकडे’ गॅंगचा पराभव करण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही अमित शहा म्हणाले. दिल्लीतल्या जामिया मिलीया विद्यापीठ आणि सीलामपूर येथील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या संदर्भाने ते बोलत होते.
कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. यामुळे राजधानीतील शांत वातावरण बिघडवत आहेत, असेही शहा म्हणाले. राष्ट्रीय राजधानीत भाजपाच्या कामगिरीबद्दल त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. दिल्लीतील केजरीवाल सरकारची वेळ पूर्ण झाली आहे आणि कमळ फुलण्याची वेळ आली आहे.
दिल्लीने भाजपला सर्व 7 खासदार दिले आहेत. आता दिल्लीच्या विकासासाठी पुढील निवडणुकीत भाजपचे आमदार देण्याची वेळ आली आहे, असेही शहा म्हणाले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहेत.
त्या पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री आवास योजना’ आणि “आयुष्मान भारत’ या योजनांची अंमलबजावणी केली नाही. केंद्राच्या योजनांना रोखण्याचे काम केजरीवाल यांनी केल्याची टीकाही त्यांनी केली.