प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहनचालकांसह स्थानिकांचे धुळीतून मार्गक्रमण
चिंबळी -पुणे-नाशिक रस्त्यावरील चिंबळी फाटा ते मोई-निघोजे दरम्यानच्या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे राज्य सरकारच्या “हायब्रीड ऍन्युईटी’अंतर्गत रुंदीकरण व नूतनीकरण करण्यात येत आहे. नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर हा रस्ता दुरुस्त केला जात आहे; परंतु संथ गतीने सुरू असलेल्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने कशी चालवावी, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. या रस्त्यावर मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाहतुकीमुळे रस्त्यावर धुळीचे मोठे साम्राज्य आहे, त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिकांसह वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चिंबळी फाटा ते मोई-निघोजे या सहा किलोमीटरच्या कामाला सुरुवात होऊन सहा महिने झाले तरीही 100 फूटसुद्धा पक्का रस्ता होऊ शकलेला नाही, उलट ज्या ठिकाणी रस्ता सुस्थितीत होता त्या ठिकाणी फूट दोन फूट खोदाई करून करून ठेवल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना वाहने चालवणे मोठे कठीण झाले आहे, त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक
केली आहे.