डॉ. नीलम गायकवाड : हुतात्मा राजगुरू विद्यालयात “कळी उमलताना’ उपक्रम
राजगुरूनगर-किशोरवयात सर्वसाधारणपणे 10 ते 11व्या वर्षी मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळीचा संबंध पवित्र-अपवित्र गोष्टींशी जोडणे चुकीचे आहे. निसर्गाने महिलांना दिलेली ही मातृत्वाची देणगी आहे, या काळात मुलींनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गायकवाड यांनी केले.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू विद्यालयात डिसेंट फाउंडेशन, जुन्नर (पुणे) यांच्या वतीने “कळी उमलताना” या उपक्रमांतर्गत डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलम गायकवाड यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डिसेंटचे प्रकल्प समन्वयक एफ. बी. आतार, आदिवासी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा मुंढे, दशनाम गोसावी, समाज विकास संस्था पुणेचे उपाध्यक्ष मल्हारी गोसावी, माजी मुख्याध्यापक फकीर आतार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या लता ठोकळ, ऍड. स्वाती आचार्य, मुख्याध्यापिका यू. जे. तांबे यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींनी स्वच्छतेची शपथ घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रेखा भोकटे, तर मनीषा हुकुम यांनी आभार मानले.