ऊसतोडणी कामगरांचा सवाल : सोमेश्वर कार्यक्षेत्रात स्वस्त धान्यापासून कामगार वंचित
वाघळवाडी- सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊसतोड मजूर स्वस्त धान्यपासून वंचित असून राज्य सरकारने पारदर्शक कारभारासाठी ई-पॉज यंत्रणा आणली असली तरी स्थलांतरित झाल्यालेल्या व्यक्तीसाठी ती निरोपयोगी ठरत आहे. हे ऊसतोडणी कामगार हवालदिल झाले आहे. तर या कामगारांना सोमेश्वर कारखाना परिसरातील स्वस्त धान्यदुकानातून शासकीय दरात धान्य मिळावे यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला आहे. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन सुपूर्त केले आहे.
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. या हंगामासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो कुटुंबे ऊसतोडणी कामासाठी कारखाना कार्यस्थळावर दाखल झाली आहेत. सुमारे सहा महिने ही कुटुंबे स्थलांतर करीत असल्याने आणि मूळ गावी जावून रेशनकार्डवरील धान्य घेऊन येवू शकत नसल्याने मजुरांना कामाच्या ठिकाणी आल्यावर धान्य विकत घ्यावे लागते. त्यामुळे गावाकडील त्यांच्या शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य घेता येत नाही. हे धान्य ना रेशनधारकांना मिळत ना स्वस्त धान्य दुकानदारांना. त्यामुळे शासनाच्या स्वस्त धान्य दुकानांच्या फायद्यापासून ही कुटुंबे सहा महिने वंचित राहतात.
साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडणी मजूर राज्याच्या विविध भागात स्थलांतरित होत असतात. मात्र, सध्या ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य वितरण करण्यात येत आहे. स्वाईप मशीनला अंगठा लावल्यानंतरच स्वस्त धान्य मिळत असल्याने या मजुरांना गावी जावून धान्य आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरील रेशनिंग दुकानात या कुटुंबाला धान्य मिळाले तर त्याचा फायदा ऊसतोड मजुरांना होईल. यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराला याबाबत परवानगी द्यावी, पोर्टेबल यंत्रणेचा त्यासाठी वापर व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शासनाच्या नियमानुसार राज्यातील कोणताही रेशनकार्डधारक कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्याचा लाभ घेऊ शकतो. पोर्टेबल यंत्रणा ही कोणताही रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने राबविली योजना आहे. या योजनेद्वारे दुष्काळ आणि कामधंद्यांसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाला धान्य देणे शक्य होणार असल्याने कोणत्याही दुकानदाराकडे धान्य उपलब्ध होणार आहे.
लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, जालना, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून हजारो ऊसतोडणी मजूर सोमेश्वरच्या कार्यस्थळावर दाखल झाले आहेत. स्वस्त धान्य दुकानातून साखर, गहू, तांदूळ, उडीद डाळ, तूरडाळ आदी घान्य उपलब्ध झाल्यास त्यांना याचा लाभ त्याच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे.
- स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डधारकांनी तीन महिने धान्य घेतले नाही, तर त्याचे नाव डेलिकेशनच्या यादीमध्ये जाते. त्यामुळे हे ऊसतोडणी मजूर सहा महिने कारखान्याच्या कार्यस्थळावर दुसऱ्या गावी रहात असतो. हंगाम संपल्यानंतर गावाकडे गेल्यावर एक ते दोन महिने रेशन सुरू करण्यासाठी त्यांना शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागतात. प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत पोर्टेबल सिस्टीमबद्दल काबाडकष्ट करणाऱ्या अशिक्षित ऊसतोड मजुरांना मार्गदर्शन करून त्यांना धान्य मिळवून देण्यास सहकार्य करावे, अशी मागणी ऊसतोडणी मजुरांकडून केली जात आहे.
- संबंधित कारखाना कार्यक्षेत्रातील मुकादमाने आपल्या मजुरांची यादी करून त्यात कामगाराचे नाव, त्याचे गाव व रेशन कार्ड नंबरची यादी तहसीलदारांकडे जमा करावी. या यादीद्वारे संबंधित दुकानदारांकडे वाढीव धान्य पाठवले जाईल अन् कामगारांना स्वस्त दरात धान्य मिळू शकेल. यादी जर आली नाही तर हे कामगार स्वस्त धान्यापासून वंचित राहतील तरी मुकादमाकडून यादी तयार करून ती तहसीलदारांकडे लवकरात लवकर जमा करा.
-भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी.