सातारा – जावळी तालुक्यातील केंजळ येथील खाणीवरून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सदस्य दीपक पवार यांच्यासह सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत या खाणीमुळे परिसरात धोका निर्माण झाला असल्याने ही खाण बंद करावी अशी मागणी केली. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर संबंधित ठेकेदारास तात्काळ नोटीस बजावण्यात येत असल्याचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
सदस्य दीपक पवार यांनी केंजळ येथील खाणीचा मुद्दा उपस्थित करुन बांधकाम विभागास चांगलेच धारेवर धरले. या खाणीमुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. खाणीतील दगडी रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका संभवत आहे. रस्त्यापासून अगदी जवळ खाण असल्याने याठिकाणी जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषदेची कसलीही परवानगी न घेता ही खाण बेकायदेशीरपणे सुरु झालीच कशी, असा प्रश्न पवार यांनी केला. संबंधित ठेकेदाराकडे कोणतीही परवानगी नाही, रस्ता खराब झाल्याने वाहतूक बंद झाली आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना जिल्हा परिषदने काहीच कारवाई केली नाही. मागील सभेतही याबाबत सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. तरीदेखील कोणी तरी संबंधितांना पाठीशी तर घालत नाही ना, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला.
उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे म्हणाले, “मी या विषयावर आवाज उठवल्यानंतर तत्कालिन पालकमंत्र्यांनी मला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मात्र, मी मागे हटलो नाही. जिल्हा परिषदेने ठराव करुन जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. रस्ता जिल्हा परिषदेचा असतानाही कोणतीही परवानगी घेतली नसताना बाहेरुन ठेकेदार येतो आणि आमच्या तालुक्याच्या ऊरावर नाचतो, हे आता सहन करणार नाही. परिसरातील लोकांच्या भावना तीव्र असून याबाबत मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांनी आता निर्णय घ्यावा.”
या खाणीस तात्पुरती परवानगी दिली होती. ती यापूर्वीच रद्द केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गुन्हा दाखल करावा, याबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी सांगितले. त्यावर आता पत्रव्यवहार बंद करुन बांधकाम विभागाकडून तक्रार दाखल करावी, अशी मागणी मानकुमरे आणि पवार यांनी केली.
संजीवराजे म्हणाले, “याप्रकरणी ठेकेदारास नोटीस काढण्यात येत आहे. खाणीबाबत कोणतीही परवानगी घेतली नसून खाण रस्त्यावर आल्याने रस्त्याचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई द्यावी. जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरुन धोकादायकरित्या वाहतूक होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी.” संबंधित ठेकेदारास नोटीस देऊन याबाबतची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. या विषयावरील चर्चेत ऍड. उदयसिंह पाटील, मंगेश धुमाळ, भीमराव पाटील यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला.