लोणी काळभोर – मानवकेंद्री विकासाच्या अतिरेकी अंमलबजावणीमुळे निसर्गाची झालेली अपरिमित हानी, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, वाढती सामाजिक विषमता अशा अनेक समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून जगाचा कायापालट करण्याचा निश्चय सर्वांनी केला पाहिजे. शहरांनी नुसतेच स्मार्ट अथवा देखणे वा चलाख असणे अपेक्षित नाही. स्मार्ट सिटीसह हेल्दी सिटीज, ग्रीन सिटीजची गरज आज आहे. हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शहरांवर अधिक जबाबदाऱ्या आहेत, असे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते प्रो. जेफ्री लिव्हरमोर यांनी केले.
ईसीएएम-ईपीएमआय, सेर्गी-पोंटॉइस (फ्रान्स), लॉरेन विद्यापीठ (फ्रान्स), क्वीन्स युनिव्हर्सिटी (कॅनडा), स्मार्ट सिटी पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्या वतीने आयोजित “ऊर्जा आणि भविष्यकालीन स्मार्ट सिटीस्’ (ईव्हीएफ 2019) या विषयावरील तीन दिवसीय 6व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी टेरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, एआयसीटीईचे सल्लागार डॉ. डी. एन. मालखेडे, इकॅम- इपीएमआय फ्रान्सचे संचालक डॉ. मेऊमेन डारशेरिफ, युनिव्हर्सिटी डे लॉरियन फ्रान्सचे प्रा. एम. ईएल गेणऊई, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी एसओईचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, डॉ. सुदर्शन सानप उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पत्राद्वारे परिषदेला शुभेच्छा दिल्या.
प्रो. जेफ्री लिव्हरमोर म्हणाले, वातावरणातील बदलामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चीन आणि भारत हे जगाला वाचवू शकतात. ऊर्जा आणि भविष्यकालीन स्मार्ट सिटीस् या सारख्या परिषदा होणे आवश्यक आहेत. 2500 वर्षांपूर्वी सिंधू खोऱ्यात शहरे होती. त्यांचा मेसोपोटेमियाशी व्यापार होता. शहरे हा एक मोठा शोध आहे. शहरे ही सर्व ज्ञानाच्या देवाणघेवाणीची असतात. जगातील शहरे ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनाच्या 80 टक्के योगदान देतात.
त्यामुळे हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शहरांवर अधिक जबाबदाऱ्या आहेत. डॉ. राजेंद्र शेंडे, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. मेऊमेन डारशेरिफ, प्रा. एम. ईएल गेणऊई, डॉ. दिलीप मालखेडे, डॉ. मंगेश कराड यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुदर्शन सानप, डॉ. सुनील राय यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल सिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर रवांदे यांनी आभार मानले.