सातारा/भुईंज – सातारा-पुणे मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, राष्ट्रीय महामार्गावर सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, या मागणीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दोन ते सव्वादोन तास टोलवसुली बंद ठेवण्यात आली होती. “आधी सुविधा, मग टोल’, अशी घोषणाबाजी करत आ. शिवेंद्रराजे समर्थकांनी टोल नाक्याच्या लेनमध्ये ठिय्या मारला. या आंदोलनामुळे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी टोल नाक्यावर यावे लागले.
या आंदोलनामुळे टोल नाक्यावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. टोल नाक्याची पुणे व सातारा या दोन्ही बाजूंकडील बूथ आमदार समर्थकांनी बंद केल्याने रिलायन्स इन्फ्राच्या कर्मचाऱ्यांनी टोल घेण्याचे धाडस दाखवले नाही. आ. शिवेंद्रराजे काल रात्री रात्री साडेदहाच्या विमानाने नागपूरमधून मुंबईत आणि तेथून वाहनाने साताऱ्यात आले. ते आपल्या समर्थकांसह आनेवाडी टोल नाक्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास पोहोचले. यावेळी पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, प्रवीण पाटील, राजू भोसले, फिरोज पठाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पवार, किशोर गालफाडे, कांचन साळुंखे यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे व समर्थकांनी कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने आंदोलन केले. “रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, “सुविधा द्या अन्यथा टोलवसुली बंद करा’, अशी घोषणाबाजी करत टोल नाक्यावर मोर्चा काढला. त्यांनी टोल नाक्याच्या मार्गिकेवर उभे राहून वाहनचालकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली. सातारा-पुणे आणि पुणे-सातारा जाणाऱ्या लेनच्या प्रत्येक बूथवर आमदार समर्थक उभे होते. काही बूथचे बूम बॅरियर काढून ठेवण्यात आले. आमदार समर्थकांनी रिलायन्स इन्फ्राचा निषेध करणारे फलक झळकले. या आंदोलनामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलवसुली सव्वादोन तास बंद ठेवली होती. आंदोलन संपल्यानंतर टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात आली.
वाहनांना अल्प वेळ टोलमाफी
आ. शिवेंद्रराजेंच्या आंदोलनामुळे दोन ते सव्वादोन तास टोलवसुली बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुणे व कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या शेकडो वाहनधारकांना टोल भरावा लागला नाही. कोणत्याही लेनमध्ये वाहनांची गर्दी नव्हती. रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर आ. शिवेंद्रराजेंशी चर्चा केली. महामार्गावर सर्व सुविधा द्याव्यात, टोल नाक्यापासून वीस किलोमीटर परिघातील गावांमधील वाहनांना टोल माफी द्यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. यासाठी रिलायन्सने 15 जानेवारीपर्यंत मुदत मागून घेतल्याचे सांगण्यात आले.
सर्वसामान्यांची पाठ
“मी टोल देणार नाही’ अशी घोषणा लिहिलेल्या गांधी टोप्या आ. शिवेंद्रसिंहराजे व समर्थकांनी घातल्या होत्या. या आंदोलनात सामान्य नागरिकांचा सहभाग फारसा दिसला नाही. त्यांच्यापेक्षा शिवेंद्रसिंहराजे समर्थकांची संख्या अधिक होती. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वसामान्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले.