नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात होणाऱ्या हिंसाचाराला भाजपाने विरोधी पक्षाला दोषी ठरवलं आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत घेतली.
संबित पात्रा म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांना भडकावले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, एआयएमआयचे खासदार असदुद्दीन ओवैसी, आपचे नेते अमानतुल्लाह खान यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी हिंसा भडकवल्याचा आरोप त्यांनी केला.
पात्रा म्हणाले की, ओवैसी हे भारताचे नवे जिन्ना आहेत तर आपचे अमानतुल्लाह हे दिल्लीचे नवीन जिन्ना बनू पाहत आहे. ओवेसी प्रत्येक विषयावर हिंदू आणि मुसलमान करून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
विरोधी नेत्यांकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असून विरोधी पक्ष त्यांचा राजकीय फायदा घेत आहेत. नागरिकत्व कायद्याबाबत जनतेला चुकीची माहिती देऊन विरोधी पक्ष हिंदू-मुस्लिम धोरण स्वीकारत आहे.
संसदेत चर्चेनंतर नागरिकत्व कायदा अस्तित्वात आला. कायद्याला असंवैधानिक म्हणणे चुकीचे आहे. विरोधकांकडून कायद्याबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात विरोधी पक्षांनी कोणतेही तथ्य विचारता न घेता कायद्या विरोधात मोर्चा काढला आहे.