मुंबई: भारताचा कसोटीपटू अजिंक्य रहाणेचा समावेश असलेला मुंबईचा रणजी संघ घोषित करण्यात आला आहे. मर्यादीत षटकांच्या संघात रहाणेला गेल्या काही मालिकांपासून स्थान देण्यात आलेले नाही, केवळ कसोटी फलंदाज अशीच त्याची प्रतिमा झालेली असली तरी रहाणेने मात्र विश्वस व्यक्त करताना एकदिवसीय तसेच टी-20 संघात परतण्याची जिद्द दाखविली आहे.
उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात बंदीची शिक्षा भोगलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉ याचाही संघात समावेश करण्यात आला असून रहाणेच्या समावेशानंतरही कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडेच देण्यात आले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईने 41 वेळा विजेतेपद मिळवत वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. यंदाही विजेतेपदासाठीच ते सज्ज आहेत. मुंबई पहिला सामना 9 डिसेंबर रोजी बडोदा संघाशी खेळणार आहे.
मुंबईचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्सा, शुभम रंजन, आकाश पारकर, सरफराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तारडे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी आणि एकनाथ केरकर.