अविनाश कदमांचे नगराध्यक्षांना निवेदन; आठ दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
सातारा – सातारा शहरातील व्यंकटपूरा पेठेतील सर्व रस्ते भुयारी गटर योजनेच्या कामासाठी खोदण्यात आले होते. सदर रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ते दुरुस्तीबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी कळवण्यात आले. मात्र रस्ते दुरुस्तीबाबत टाळाटाळ होत असून येत्या आठ दिवसांत व्यंकटपूरापेठेतील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा दि. 25 रोजी रास्ता रोको करुन नगरपालिका कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे.
याबाबत कदम यांनी नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्त्यांची कामे 11 नोहेंबर 2019 पासून सुरु करत असल्याचे नगराध्यक्षांनी नगरसेवकांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले होते. तसे संबंधीत अधिकारी आणि ठेकेदार कुमार यांना नगराध्यक्ष सौ. माधवी कदम यांनी सुचीत केले होते.
व्यंकटपुरा पेठेसह गेंडामाळ जकात नाका ते कोटेश्वर मंदीर याही रस्त्याची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली असून याही रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी आम्ही केली होती. याबाबतही नगराध्यक्षांनी सकारात्मकता दर्शवत रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दुर्दैवाने अद्यापही गेंडामाळ जकात नाका ते कोटेश्वर मंदीर आणि व्यंकटपुरा पेठेतील एकाही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झालेले नाही.
सबब येत्या आठ दिवसांत या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी. अन्यथा दि. 25 रोजी रास्ता रोको व बोंबाबोंब आंदोलन आदी मार्ग नाईलाजास्तव स्विकारावे लागतील आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही सातारा पालिका प्रशासनाची असेल, असा इशारा कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.