मुंबई – सरकार स्थापनेच्या पेचावरून राज्यात उडालेल्या राजकीय धुराळ्यात शुक्रवारी मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार अडकले. त्याला कारणीभूत ठरले ते त्यांनी केलेले एकसारखे ट्विट.
सरकार स्थापनेच्या पेचामुळे राज्यात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते, असा अंदाज काही जणांकडून वर्तवला जात आहे. अशातच सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी एक ट्विट केले. पुन्हा निवडणूक? असे ते ट्विट होते. त्यावरून नेटकरी संतापले.
त्या कलाकारांनी कुणाच्या निर्देशावरून ते ट्विट केले, असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी केला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनीही त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. कुठल्या राजकीय पक्षाच्या सुचनेवरून कलाकारांनी ते पाऊल उचलले का, अशी विचारणा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली.
वादंग निर्माण होत असल्याचे ध्यानात आल्यानंतर संबंधित कलाकारांच्या निकटवर्तीय सुत्रांनी स्पष्टीकरण दिले. संबंधित कलाकार एका राजकीय विषयावर आधारित चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. त्यांच्या ट्विटचा संबंध सध्याच्या राजकीय स्थितीशी नाही. येत्या काही दिवसांत त्या चित्रपटाची माहिती समोर येईल, असे त्या सुत्रांनी नमूद केले.