दत्तात्रय आंबुलकर
मध्यवर्ती मुंबईच्या परळ परिसरातील सुप्रसिद्ध अशा टाटा कर्करोग रुग्णालयाच्या जवळील पदपथावर कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एक व्यक्ती नेहमीच मदत करताना दिसते. या व्यक्तीचे नाव आहे हरखचंद सावला.
हरखचंद सावला यांच्या जीवन ज्योती कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेद्वारा रोज 700 हून अधिक लोकांना दोन्ही वेळचे भोजन दिले जाते. हे काम सावला आणि त्यांची संस्था गेल्या 27 वर्षांपासून करीत आहे. आजवर सुमारे 10 लाख रुग्ण आणि नातेवाईकांना आपली भोजनसेवा उपलब्ध करून दिली आहे.
सावलाजींच्या मते त्यांनी कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला तो एका चुकीचे परिमार्जन करण्याच्या भूमिकेतून. यासंदर्भात सावला आपल्या आठवणीतून सांगतात की ते पूर्वीपासूनच मुंबईच्या लोअर परळ मित्रमंडळाशी जोडलेले होते. मंडळातर्फे गरजू लोकांना लहान-मोठ्या स्वरूपात मदत केली जात असे. एक दिवस एक मुलगी तिच्या कर्करोगग्रस्त आईला घेऊन आली व आईचा आजार आणि उपचारांची माहिती देऊन मदतीची विनंती केली.
त्यानुसार सावला ती मुलगी व तिच्या कर्करुग्ण आईला घेऊन त्यांच्या हॉटेलसमोरील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेऊन गेले. तेथे उपचारासाठी खूप खर्च येईल असे समजल्याने त्यांना घेऊन ते शीवच्या लो. टिळक रुग्णालयात गेले. नंतर सावलांना समजले की त्यांनी चुकीने त्या मुलीच्या आईला टाटा रुग्णालयाच्या सवलतीच्या विभागाऐवजी खासगी विभागात नेले व त्यामुळे ती मुलगी व तिच्या आईला मोठा खर्च आला. सावलांनी त्यांच्या या चुकीबद्दल माफी मागितली असता त्या मुलीची प्रतिक्रिया होती, आईच्या जीवापेक्षा अन्य कुठलीही बाब मोठी असू शकत नाही.
त्याच दिवसापासून सावलाजींनी आपल्या त्या चुकीचे परिमार्जन म्हणून कर्करुग्ण आणि त्यांच्या मुंबईत येणाऱ्या नातेवाईकांना मदत करण्याचे काम एक सेवा व्रत म्हणून सुरू केले. सुरुवातीला त्यांच्या भोजन-सेवा उपक्रमाचा फायदा मोजकेच रुग्ण नातेवाईक घेऊ लागले. नंतर मात्र ही संस्था वाढत गेली. 12 वर्षे सावलाजी हे काम एकटेच करीत होते. मात्र मोफत जेवण घेणाऱ्यांची संख्या वाढतच गेली.
मर्यादित पाठबळ व साधनसामग्रीसह सेवा देणे कठीण झाले तरी सावलाजींनी आपली हिंमत आणि प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी आपले हॉटेल भाड्याने देऊन रक्कम जमविली आणि जीवन ज्योती कॅन्सर ट्रस्ट सुरू करून त्याद्वारे गरजूंना मोफत औषधं देण्यासाठी औषध बॅंक सुरू केली. सध्या स्वयंसेवक स्वरूपात काही सेवाभावी डॉक्टर्स व फार्मासिस्ट त्या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. कर्करोगग्रस्त मुलांसाठी खेळणी बॅंक ट्रस्टद्वारा स्थापन करण्यात आली आहे. ट्रस्टद्वारा सध्या 60 पेक्षा अधिक सेवा-उपक्रम सुरू असून त्याचा व्याप जळगाव, कोलकाता या शहरांपर्यंत पोहोचला आहे.