राष्ट्रवादी कॉंग्रेस: मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकीसारखे
मुंबई : महायुतीला सरकार स्थापण्यात अपयश आल्यास पर्यायी सरकार देण्याच्या प्रयत्नांबाबत विचार करण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने शुक्रवारी केले. त्यामुळे महायुतीचे जमणार की फिस्कटणार याकडे विरोधक नजरा लावून बसल्याचे स्पष्ट झाले.
भाजप, शिवसेना आणि इतर लहान पक्षांचा समावेश असणारी महायुती विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली. बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडाही महायुतीने पार केला. मात्र, सत्तावाटपाच्या सुत्रावरून भाजप आणि शिवसेनेचे बिनसले आहे. आपापल्या सुत्रावर दोन्ही पक्ष ठाम असल्याने महायुतीचे सरकार स्थापन होणार की नाही याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांच्या हालचालींनाही महत्व प्राप्त झाले आहे.
मात्र, सध्या तरी त्यांनी वेट अँड वॉच हेच धोरण अवलंबल्याचे संकेत मिळत आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका मांडली. जनतेने भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी कौल दिला आहे. मात्र, त्यांना त्यात अपयश आल्यास पर्यायी सरकार देण्याबाबत आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले. नवे सरकार 7 नोव्हेंबरपर्यंत स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्या वक्तव्यातून त्यांनी शिवसेनेला इशारा दिल्याचे मानले जात आहे. त्याबाबत विचारल्यावर मलिक यांनी ते वक्तव्य धमकीसारखे असल्याची प्रतिक्रिया दिली.