नवी दिल्ली – मुंबईतील बुडित निघालेल्या पीएमसी बॅंकेतील खातेदारांना त्यांच्या ठेवी काढण्याच्या संबंधात जे निर्बंध घालण्यात आले आहेत ते उठवण्यात यावेत अशी याचिका या खातेदारांच्यावतीने सुप्रिम कोर्टात करण्यात आली होती. पण त्या याचिकेवर त्यांना कोणताहीं दिलासा देण्यास सुप्रिम कोर्टाने आज नकार दिला.
या संबंधात याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात जावे त्यांच्या याचिकेवर आम्ही कलम 32 नुसार कोणताहीं निर्णय देऊ शकत नाही असे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. या संबंधात आज जी सुनावणी झाली त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, खातेदारांना ज्या अडचणी येत आहेत.
त्याचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आले आहे आणि यातील दोषींच्या विरोधात ईडी मार्फत योग्य ती कारवाई सुरू आहे. त्यांच्या या प्रतिपादनानंतर याचिकाकर्त्यांना हायकोर्टात दाद मागण्याची सुचना करून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली.