श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्याबरोबर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनराध्यक्ष अशोक खेंडके यांनी केले.
भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा शहरातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या चौक सभेत ते बोलत होते.श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहेत. या प्रचारा दरम्यान शहरामध्ये नगरपालिकेचे आजी माजी सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.
आज झालेल्या प्रचार दौऱ्यात उपनगराध्यक्षांनी मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ही निवडणुक पाचपुते यांची नसून सर्व श्रीगोंद्यातील नागरिकांची निवडणूक आहे.आपल्या तालुक्याचे मागील पाच वर्षात पोरकटपणामुळे वाटोळे झाले. फळबागा जळलेल्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. हे पाप फक्त पोरकटपणाचा कळस झाल्यामुळे. त्याचबरोबर पाचपुतेंचे शहराच्या विकासासाठी मोठे योगदान आहे.
पाचपुते हे पदावर नसताना देखील शहराच्या विकासासाठी पिण्याच्या पाण्याची घोड धरणावरून पाणी योजना आणली व शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. शहराच्या सुंदरतेत बाह्यवळण रस्त्यामुळे भर पडली. हे काम फक्त पाचपुतेंमुळेच झाले. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून पाचपुते यांनी कामे केली. शहराच्या विकासात भर घातली पाहिजे म्हणून श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिक पाचपुतेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत, असे खेंडके म्हणाले.