शहांच्या वक्तव्यावरून मित्रपक्ष भाजपवर साधला निशाणा
मुंबई- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील भाषणात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने मित्रपक्षावर निशाणा साधला आहे. गुंतवणूक, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेल्याचे प्रमाणपत्र शहांनी दिले. तेच पुढचे मुख्यमंत्री, असेही शहांनी जाहीर केले. त्यामुळे विधानसभा निवडणुका ही आता केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त ईव्हीएमचे बटणच दाबायचे आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून एकप्रकारे भाजपने आधीच सगळे ठरवून टाकल्याची नाराजीची भावना व्यक्त करण्यात आली आहे. विरोधक म्हणून राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी पडल्याच्या आशयाची टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. कॉंग्रेस अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहे. तर राष्ट्रवादी लटपटत्या पायांवर उभी आहे.
विकास, बेरोजगारी, कर्जमाफीतला गोंधळ, पीक विमा योजनेतील त्रुटी या प्रश्नांवर सत्तेत असूनही शिवसेनेने आवाज उठवला. ते मार्गीही लावले. आज त्यावर बोलणारे विरोधक त्यावेळी मात्र गप्प होते, असा शाब्दिक टोला विरोधकांना लगावण्यात आला आहे.