पुणे – एमआयएमशी बोलणी आम्ही बंद केलेली नाही. त्यांच्याबरोबर आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत, पण त्यांनीच दरवाजे बंद करून त्याला कुलूप लावले आहे. तसेच, कुलपाची चावीसुद्धा त्यांनी स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे आता आम्ही स्वबळावर 288 जागा लढविणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ऍड. आंबेडकर म्हणाले, राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करायचे असल्यास वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविणे आवश्यक आहे. याबाबतची ध्वनिचित्रफित सुद्धा यावेळी दाखविण्यात आली. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास नक्कीच ही योजना राबवेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, आम्ही विरोधीपक्षात नाही तर सत्तेत येणार आहोत. मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटत असल्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले. आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. निवडून आले की आमचे व्हिजन सुद्धा ठरले आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या अनेक वर्षांपासून असणारे दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमच्याकडे व्हिजन आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.