गाड्यांचे उत्पादन पुढील काही दिवस ठेवणार बंद
नवी दिल्ली : ऑटो क्षेत्रात सुरू असणाऱ्या मंदीचा फटका देशातील अग्रगण्य कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला देखील बसला असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे कंपनी पुढील काही दिवस आपल्या गाड्यांचे उत्पादन बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने आपल्या तिमाहीत पुढील 8 ते 17 दिवस गाड्यांचे उत्पादन बंद ठेवत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीलादेखील या मंदीचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
उत्पादनातील समायोजनासाठी काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यापुर्वी देखील जुलै ते सप्टेंबर दरम्यान कंपनीने 8 ते 15 दिवस कंपनीच्या गाड्यांचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने शेअर बाजारात पाठवण्यात आलेल्या सुचनेत, तिमाहीत तीन दिवस अतिरीक्त उत्पादन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यापुर्वी कंपनीने देशातील विविध कारखान्यातील वाहन उत्पादन 14 दिवस बंद ठेवले होते. तसेच कंपनी या महिन्याच्या शेवटीदेखील शेतीशी निगडीत उपकरणांचे उत्पादन बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बाजारात वाहनांची पर्याप्त सामुग्री उपलब्ध असल्याने त्याचा वाहनांच्या विक्रीवर कोणाताही परीणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.