बारामती औद्योगिक वसाहतीतील स्थिती; दुष्काळीस्थितीचा परिणाम
जळोची – देशाचा कणा म्हणून ओळखली जाणारी शेती दुष्काळामुळे आणि औद्योगिक वसाहतही मंदीच्या सावटातून जात आहे. बारामती तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यांतील दुष्काळीस्थितीमुळे शेतात काम नसल्याने बारामती औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या गेट समोर कुशल, अकुशल कामगारांची गर्दी दिसू लागली आहे. शेतात काम नसल्याने अनेक जण मिळेल ते काम मिळवण्याकरिता औद्योगिक वसाहतीत येत असल्याचे चित्र आहे.
बारामती तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने शेती अडचणीत आली आहे. कालव्यांना आवर्तने नसल्याने तसेच पाण्याचे स्त्रोत आटल्यानेही शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामात शेतात काहीच काम नव्हेत आता रब्बीची तयारी सुरू करायची असली तरी पावसाअभावी रान मोकळी पडली आहेत.
यामुळे शेतमजुरांना काम नाही तसेच शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण मुले मोळ्या रानात फिरून घरी परतत आहेत. खरीप नंतर रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट असल्याने शेतमजुरांसह शेतकरी कुटूंबातील बहुतांशी तरूण औद्योगिक वसाहतीत कामाकरिता चकरा मारू लागले आहेत. बारामती तालुक्यातील बहुतांशी गावांना व्यावसायाची परंपरा लाभली आहे.
शेतीवर अवलंबून राहणाऱ्या कुटुंबाची संख्या जास्त असली तरी आज प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एक-दोन मुले नोकरीकडे वळत आहेत. तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने कुलश, अकुशल कामगारांची गरज असते. यातूनच रोजगार उपलब्ध होत असतात. त्यातच आता दुष्काळीस्थितीमुळे अनेक तरूणांनी कंपन्यांची वाट धरल्याने याचा म्हणून शेतीमजूर मिळणेही कठीण झाले आहे.
मातीतील हात झाले काळे
बारामती तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच पिकांनाही चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात हजेरी देऊ शकत नाही. महिला मजुरांना 200 ते 250 रुपये आणि पुरुष मजुरांना 300 ते 350 रुपये शेतमुजरी देऊनही मजूर मिळत नसल्याचे स्थिती असते. यावर्षी तर दुष्काळच पडल्याने शेतात काम नाही. यामुळे शेतकऱ्याच्याच हाताला काम नाही. यामुळेच शेतातील मातीत राबणारे हात कंपन्यांमध्ये काळे होऊ लागले आहेत.