धुळे: धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ रसायनांच्या एका कारखान्यामध्ये आज नायट्रोजन गॅस सिलेंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट झाले आणि किमान 13 कामगारांचा मृत्यू झाला. तर 58 जण जखमी झाले. सकृतदर्शनी या स्फोट मालिकेतील कारण रसायनांची गळती असल्याचे लक्षात आले आहे. बॅरलमधून गळती झालेल्या रसायनांमुळे आग लागली आणि त्यामुळे हे साखळी स्फोट झाले.
शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी गावामध्ये सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रुमित केम्सिन्त प्रा. लि. या कारखान्यात औषधांसाठी लागणारी रसायने तयार केली जात असत. कारखान्यामध्ये स्फोट झाले त्यावेळी किमान 100 कामगार कामावर होते. घटनेनंतर त्वरित बचाव कार्य सुरू करण्यात आले असून फॅक्टरीला लागलेली आग विझवण्यत आली आहे.
अग्निशामक दल, पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहे, असे पोलिसांनी सांगितले. हे स्फोट बॉयलरचे असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. कारखान्यातील नायट्रोजन सिलिंडरमुळे आग झपाट्याने पसरली. स्फोटांच्या प्रचंड आवाजाने परिसरामध्ये घबराट निर्मण झाली होती.
जखमींना धुळ्याच्या सरकारी रुग्णालयामध्ये आणि शिरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांनी या घटनेबाबतची माहिती घेतली.