पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून एक लाख रुपये ; 308 कुटुंबांना 15 लाख 40 हजार सानुग्रह अनुदान
कोल्हापूर – पुरामुळे 528 पाणी पुरवठा योजना बंद होत्या त्यापैकी 169 योजना सुरु करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजना सुरु करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीमधून 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदान वाटपास आज सुरुवात करण्यात आली. 308 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 15 लाख 40 हजार रुपये आज वाटण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
पूरग्रस्त गावांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, 15 हजार कुटुंबांना आज 10 किलो गहू व 10 किलो तांदुळ मोफत देण्यात आले. हाही लाभ सर्व बाधित कुटुंबांना देण्यात येणार आहे. पुरामुळे 2 लाख 37 हजार वीज जोडण्या बाधित झाल्या होत्या त्यापैकी 1 लाख 77 जोडण्या सुरु करण्यात आल्या आहेत.
बाधित झालेल्या 26 उपकेंद्रांपैकी 23 सुरु करण्यात आले आहेत. 528 पाणी पुरवठा योजना बंद होत्या त्यापैकी 169 पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजना सुरु करण्यासाठी निधीची आवश्यकता होती प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हा आपत्ती निधीमधून 1 लाख रुपयांचा निधी या योजनांच्या दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांचे घरांचे नुकसान तसेच इतर साहित्यांचे नुकसान झाले आहे त्यासाठी ग्रामीण भागात 10 हजार रुपये तर शहरी भागात 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचा आज पहिला हप्ता 308 कुटुंबांना देण्यात आला. तसेच प्रतीदिन प्रती माणसी 60 रुपये व लहान मुलांना 45 रुपये याप्रमाणे मदत देण्यास आजपासून प्रांरभ झालेला आहे, असेही ते म्हणाले.