जामखेड – लेन्हेवाडी परिसरातुन जामखेड शहराला पाणीपुरवठा होत असल्याने लेन्हेवाडी रस्ता खराब झाला आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच नागरीकांना देखील त्रास होत असल्याने येथील रस्त्याला जादा निधी देऊन रस्ता लवकर तयार करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जामखेड नगरपपालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले.
जामखेड शहराला टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा लेन्हेवाडी गावच्या रस्त्यावरून होतो. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर खड्डे पडले आहे. रस्ता खराब झाला आहे. या परीसरातील शाळेत जाणारे मुले, मुली तसेच लेन्हेवाडीतील ग्रामस्थांना त्याचा दररोजच्या त्रास होत आहे. शासनाकडून रस्त्यासाठी मिळालेला निधी हा तुटपुंजा आहे. या त्रासाला वैतागून लेन्हेवाडीतील ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात यांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.
नगरपालिका मुख्यधिकारी सुहास जगताप व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, शहराला पाणीपुरवठा करणारे टॅंकर या रस्त्याने जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे हे टॅंकर बंद करावेत, तसेच रस्त्याचे काम त्वरित चालू करावे, रस्त्यासाठी मिळालेल्या अपुऱ्या निधीमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्या माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, अण्णासाहेब मगर, रामहरी बाबर, भाऊ जगताप, विष्णु सागडे, युवराज सुरवसे, सागर जगताप यांनी केल्या आहेत. जगताप यांनी लवकरच रस्ता दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.