मुंबई – एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. महाराष्ट्राच्या लालपरीचा शनिवारी 71 वा वर्धापनदिन साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई लोकलच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असेल. स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असेल. तर रुवातीला त्यामध्ये 300 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती किंवा मित्र एसटीच्या प्रवासावेळी हे कार्ड स्वाइप करुन प्रवास करु शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी,एसटी महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरीक, कामगार, दिव्यांग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सवलत पास योजना जाहीर केली होती. मात्र, बहुतांशी नागरिकांच्या मतदान ओळखपत्रावर चुकीची जन्मतारीख लागली आहे. त्यामुळे चाळीस अथवा पंचेचाळीशीतील नागरिकांचेही वय साठ अथवा त्यापुढे दाखविण्यात आले आहे. याच तांत्रिक चुकीचा फायदा उठवत अनेक नागरिक वय पूर्ण झाले नसतानाही सवलतीच्या दरात प्रवास करत होते. याची गंभीर दखल घेऊन ही फसवणूक टाळण्यासाठी या पासधारकांना “स्मार्ट कार्ड’ देण्याचे आणि आधारकार्ड त्याला लिंक करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने निर्णय घेतला होता. मात्र, कार्डची छपाईच न झाल्याने वितरण पूर्णपणे ठप्प झाले होते. या दिरगांईमुळे एसटी महामंडळाला दररोज लाखोंचा तोटा सहन करावा लागत होता.