दिल्ली – निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी काल एका पत्रकार परिषदेद्वारे लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 19 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार मुदतीपूर्वीच थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याची माहिती दिली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारच्या “रोड शो’ वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले असून आज रात्री 10 वाजल्यापासून निवडणूक संपेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारास बंदी असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सर्वच विरोधी पक्षांतर्फे निवडणूक आयोग पक्षपातीपणे निर्णय घेत असल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करत विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळाने आज दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना विरोधी पक्षांच्या शिष्ठमंडळाचे सदस्य काँग्रेस नेते आणि जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू संघवी यांनी, “आम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक प्रतिसाद दिला नाही.” अशी माहिती दिली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील डमडम. बारासात, बासिरहात, जयनगर, मथुरापूर, जदवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकात्ता या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 मे (रविवारी) मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यामध्ये निवडणुका होणाऱ्या मतदारसंघांमध्ये प्रचाराची मुदत शुक्रवारी सायंकाळपर्यंत असली तरी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने आर्टिकल ३२४चा वापर करत ही मुदत कमी केली आहे.
Delhi: Opposition delegation met with EC over ending election campaign in West Bengal 24 hours early. Abhishek Manu Singhvi, Congress says, "We did not receive a satisfactory response from the Election Commission." pic.twitter.com/mC4QpDlJQ0
— ANI (@ANI) May 16, 2019