चेन्नई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेते कमल हसन सध्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ते सध्या तामिळनाडूतील मध्यावधी निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अशातच आज कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य केल्याने सकाळपासूनच राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आहे.
दरम्यान, कमल हसनद्वारे करण्यात आलेल्या या वक्तव्याबाबत तामिळनाडू भाजपने आक्षेप नोंदविला असून कमल हसन यांचे हे वक्तव्य सामाजिक ध्रुवीकरण करणारे असल्याचा आरोप लावत यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे.
तत्पूर्वी कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बोलताना, “मी हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्याने हे विधान करीत नसून मी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उभा असल्याने सांगतोय की नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता.” असं वक्तव्य केलं होतं.
नथुराम गोडसे याने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठी भूमिका बजावणाऱ्या महात्मा गांधी यांची हत्या केली असल्याने त्याच्यावर याआधी देखील अनेकांद्वारे अशाप्रकारचे आरोप करण्यात आले आहेत.