पुणे – स्वच्छ भारत अभियामध्ये पुणेकरांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सांगितले.
पुणे शहराचा देशपातळीवर नावलैकीक वाढावा, त्याचबरोबर आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण-2020 मध्ये सहभाग घेतला आहे. मागीलवर्षी झालेल्या सर्वेक्षणामध्ये शहराचा खालचा क्रमांक आला.
महापालिका प्रशासनाने मागिलवर्षी शहर स्वच्छतेमध्ये अधिक गुण मिळवले होते. सादरीकरणामध्ये प्रशासन कमी पडल्यामुळे खालचा क्रमांक मिळाला. स्वच्छ सर्वेक्षणाचे नियम दरवर्षी बदलत असतात. त्यामुळे यावर्षीही नियमात काही बदल झालेले आहेत. त्यादृष्टीने नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याचे राव म्हणाले.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाने वर्षाच्या सुरुवातीपासूनच तयारी सुरू केली आहे. आतापासूनच अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. शहरातील वेगवेगळ्या स्तरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांच्या बैठका घेण्यात येत आहे. शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभाग घेतला पाहिजे. यापुढे महापालिका ज्या कार्यक्रमांना परवानगी देणार आहे. त्या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रचारही करण्यात येणार असल्याची राव यांनी नमूद केले.
दंडात्मक कारवाई करणार
शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेचे अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांकडून कारवाई करण्यात येत आहे. गृहप्रकल्पांमध्ये 70 पेक्षा जास्त सदनिका असतील तर तेथे घनकचरा जिरवण्याचा प्रकल्प असल्याशिवाय बांधकाम विभागाकडून इमारत पूर्णत्त्वाची दाखल देण्यात येणार नाही. यामुळे पुढील काळात ज्या सोसायट्यांमध्ये प्रकल्प नसतील आणि ज्यांचे प्रकल्प कार्यन्वित नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.