पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकणाऱ्या वारसा स्थळांमध्ये शनिवारवाडा हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पूर्वी पुणे शहराला वाड्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. विश्रामबाग, मुजुमदार, निघोजकर आदी वाडे पुण्यामध्ये आजही प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती ठिकाणी असणारा शनिवारवाडा पुण्याची शान असून हे पेशव्यांचे निवासस्थान होते. सुरक्षेला प्राधान्य देऊन वाड्याची रचना करण्यात आली. शनिवारवाड्यात प्रवेश केल्यानंतर वाड्याची रचना लक्ष वेधून घेते.
शनिवारवाड्याचे बांधकाम सन 1730 मध्ये सुरू झाले. तर 22 जानेवारी 1732 साली बांधकाम पूर्ण झाले झाले. हा वाडा 287 वर्षे डौलाने उभा आहे. शनिवाड्याच्या बांधकामासाठी त्याकाळी 16,120 रुपये खर्च आला होता. सन 1928 साली हा वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या केवळ तटबंदी असणाऱ्या भिंती आणि वाड्याची रचना पाहता येते. शनिवारवाड्यासमोर पहिल्या बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा आहे.
सध्या शनिवारवाड्यातील वाड्याची तटबंदी आणि 9 बुरुज पाहायला मिळतात. यात दोन बुरुज संपूर्ण दगडी तर सात बुरुज विटा आणि दगडाचे आहेत. शनिवारवाड्याला उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला असणारे एकूण पाच दरवाजे आहे. उत्तरेकडे असणारा “दिल्ली दरवाजा’ मुख्य दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याला असणारी अणकुचीदार टोके हे या दरवाज्याचे वैशिष्ट्ये आहे. “दिल्ली दरवाजा’ फक्त 22 जानेवारी रोजी उघडण्यात येतो. “दिल्ली दरवाजा’सह अन्य दरवाजे “गणेश दरवाजा’, “मस्तानी दरवाजा’ आदी नावांनी ओळखले जातात. शनिवारवाड्यामध्ये सात खणी इमारत, गणेश महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना, जुना आरसे महल असल्याचे म्हटले जाते. तर वाड्याच्या परिसरांतील कारंजे “हजारी कारंजे’ म्हणून ओळखले जाते.