नवी दिल्ली – 15 परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतात याबाबत कमालीचे आशावादी झाले आहेत. एप्रिल महिन्यात या गुंतवणूकदारांनी भारतात 11,096 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन महिन्यांपासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करीत आहे.
फेब्रुवारी महिन्यात या गुंतवणूकदारांनी 11 हजार 182 कोटी रुपयांची तर मार्च महिन्यात 45 हजार 981 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, जानेवारी महिन्यात शेअरबाजार आणि कर्जरोखे बाजारातून या गुंतवणूकदारांनी 5360 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. डिपॉझिटर्सनी जाहीर माहितीनुसार या गुंतवणूकदारांनी 1 ते 12 एप्रिल या काळात शेअरबाजारात 13,308 कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर कर्जरोखे बाजारातून 2212 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली.
ग्रो या संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी हरीश जैन म्हणाले की भारतात स्थिर सरकार कायम राहण्याची शक्यता वाटत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात व इतर क्षेत्रात बरीच गुंतवणूक करीत आहेत.
त्याचबरोबर या काळात जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर भारताचा विकास दर इतर देशांच्या तुलनेत चांगला राहणार असल्यामुळे भारतात गुंतवणूक होत आहे.
याबाबत बोलताना मॉर्निंग स्टार संस्थेचे संशोधन व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, व्यापारी तणाव कमी झाला आहे त्याचबरोबर जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जागतिक गुंतवणूकदार आशावादी आहेत. जर निवडणुकात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर परदेशी गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या निर्णयाबाबत फेरविचार करू शकतात.
मात्र, परदेशातील परिस्थिती भारतासाठी बरीच पूरक आहे. एकतर अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने आगामी काळात व्याजदर कमी पातळीवर ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर युरोपातील बॅंकांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर भांडवल सुलभता वाढून भारतात गुंतवणूक वाढेल.